Last Updated on 11 Sep 2025 7:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नेतृत्त्वाखाली महसूल विभागाची विशेष मोहीम
अधिकार अभिलेखात नावनोंदणी होणार जलद
शेतकरी, सामान्य नागरिकांच्या पैसे व वेळेत बचत
सांगली । शेतकरी व सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा दस्तावेज असणाऱ्या सात-बारा उताऱ्यावरील नाव नोंदणी आणि फेरफार प्रक्रिया आता गतिमान झाली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे सांगली जिल्ह्यात फेरफार निर्गत होण्यासाठी लागणारा सरासरी कालावधी लक्षणीयरीत्या घटला आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नेतृत्त्वाखाली उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे वारस किंवा खरेदी विक्री, ७/१२ वर नाव नोंदविण्यात होणारा विलंब, त्या नोंदीबाबत प्राप्त हरकती, सुनावणी, निकाल यामध्ये वेळ व पैशाचा अपव्यय होऊन ७/१२ सदरी नाव नोंदणी होण्यास होणाऱ्या विलंबावर मात करता येणे शक्य झाले आहे. खरेदी विक्री, वारस आदि माध्यमातून शेतजमिनीच्या अधिकार अभिलेखामध्ये आता जलद गतीने नावनोंदणी होत असल्याने शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा – वाळवा तालुक्यात सेवा पंधरवडा अंतर्गत शिवपाणंद रस्ते मोहीम प्रभावीपणे राबवणार
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांची दूरदृष्यप्रणालीद्वारे साप्ताहिक बैठक घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. फेरफार प्रलंबित राहण्याच्या कारणांचा सखोल आढावा घेतला व त्यातील अडचणी दूर केल्या. तालुक्यांसाठी पालक अधिकारी नेमले गेले. पूर्वी अनोंदणीकृत फेरफार (वारस नोंदी) निकाली काढण्यासाठी सरासरी १९१ दिवस लागत होते. आता ही प्रक्रिया अवघ्या ८८ दिवसांत पूर्ण होत आहे, म्हणजेच १०३ दिवसांची बचत झाली आहे. तसेच, नोंदणीकृत खरेदी दस्तांवरील हरकतींमुळे फेरफार निकाली काढण्यास लागणारा १६४ दिवसांचा कालावधी आता ९२ दिवसांवर आला आहे. अनोंदणीकृत फेरफार निकाली काढण्यासाठी २५ ऐवजी २२ दिवस, तर नोंदणीकृत दस्तांवरील फेरफार ३४ ऐवजी २८ दिवसांत पूर्ण होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत आहे.
मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवस कृती आराखडा अभियानादरम्यान फेरफार संवेदनशील विषयाबाबत कामकाज केल्याने ७/१२ वर नावाची नोंद लवकर होत असल्याने नागरिकांना समाधान, आनंद वाटत आहे. या यशस्वी मोहिमेमुळे महसूल विभागाची प्रतिमा उंचावण्यात मदत होत असून, नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास दृढ झाला आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे आणि महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.













































































