Last Updated on 10 Sep 2025 10:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राखीव उमेदवारांनी १५ सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आवाहन
मुंबई | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने आयबीपीएस या संस्थेमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकाल राखीव ठेवलेल्या ३१८७ उमेदवारांनी आपली माहिती १५ सप्टेंबर पर्यंत www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकमध्ये देण्यात यावी. त्यानंतर माहिती सादर करणाऱ्या उमेदवारांच्या राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने दिनांक २७ मे २०२५ ते ३० मे २०२५ आणि दिनांक ०२ जून २०२५ ते ०५ जून २०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये एकूण ६० परीक्षा केंद्रांवर शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेस एकूण २,२८,८०८ परीक्षार्थी / उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेस एकूण २,११,३०८ प्रविष्ट झाले होते.
या परीक्षेचा निकाल दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी गुणयादी व गुणपत्रक (SCORE LIST & SCORE CARD) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण ६,३२० प्रविष्ट (Appear) विद्यार्थी/उमेदवारांपैकी २७८९ विद्यार्थी/ उमेदवारांचा निकाल दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. तद्नंतर दि. ०३ सप्टेंबर २०२५ रोजी ३४४ विद्यार्थी/ उमेदवारांचा निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे.
राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण ६३२० प्रविष्ट (Appear) विद्यार्थी/ उमेदवारांपैकी एकूण ३१८७ प्रविष्ट (Appear) विद्यार्थी/ उमेदवारांनी २ मे २०२५ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिलेल्या संकेतस्थळावरील लिंकद्वारे अद्यापही माहिती न भरल्याने अशा ३१८७ विद्यार्थी/ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे.
यास्तव या उमेदवारांनी दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंक मध्ये माहिती व अंतिम वर्षास प्रविष्ट उत्तीर्ण असल्याबाबतचा निकाल देण्यात यावा. दि १५ सप्टेंबर २०२५ नंतर माहिती सादर करणाऱ्या विद्यार्थी/ उमेदवारांच्या राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी/ उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
स्रोत : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय














































































